BANNER

The Janshakti News

गुरु पौर्णिमेनिमित्त मोराळे ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम.. आजी-माजी सर्व शिक्षकांचा घेतला कृतज्ञतापूर्वक सत्कार सोहळा...



                                  व्हिडिओ



 पलूस दि. २१ : पलूस तालुक्यातील मोराळे ग्रामपंचायतीच्या वतीने आज गुरुपौर्णिमेनिमित्त एक अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. मोराळे जिल्हा परिषद शाळेतील आजी-माजी सर्व शिक्षकांना आज गुरु पौर्णिमे निमीत्त ग्रामपंचायतीने  एकत्र केले आणि आपल्या गावातील गेल्या अनेक वर्षात ज्यांनी अनेक पिढ्या घडवल्या त्या सर्व शिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करुन सन्मान  केला.. मोराळे ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका शिरतोडे, उपसरपंच सीमा पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील ,बबन दादा पाटील,तसेच ज्येष्ठ नेते श्रीरंग शिंदे ,प्रशांत पाटील, सुभाष सव्वाशे आदी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्व शिक्षकांना सन्मानपूर्वक शाल श्रीफळ देऊन त्यांचे औक्षण करण्यात आले. या कृतज्ञतापूर्वक सत्कार सोहळ्याने सर्व शिक्षक वर्ग भारावून गेला.


मोराळे शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक मारुती शिरतोडे, निवृत्त मुख्याध्यापक गणपती जाधव ,तासगाव तालुक्यातील चिंचणी नं १ चे वरिष्ठ मुख्याध्यापक उदय कुमार रकटे ,वाळवा तालुक्यातील शिगावचे वरिष्ठ मुख्याध्यापक अशोक कोळेकर , केंद्र प्रमुख राम चव्हाण,शिक्षक अश्विनी घोरपडे ,अश्विनी पोतदार, महादेव जाधव, बाळासाहेब खेडकर, निवृत्त शिक्षक दिनकर पोतदार, सुशीला जाधव आदींचा सन्मान केला.यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे पंचायत समिती शिक्षण विभागाकडील पलूसचे केंद्रप्रमुख राम चव्हाण म्हणाले की शिक्षक हाच खरा राष्ट्राचा शिल्पकार असून त्याच्याबद्दल  गाव पातळीपर्यंत कृतज्ञता राखली जाणे हीच त्याच्या कामाची सर्वात मोठी पोचपावती असते.तर ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील यांनी शिक्षक हाच गावच्या परिवर्तनातील एक संवेदनशील घटक असून शाळेच्या माध्यमातून तो गावच्या विकासात योगदान देत असतो.ग्रामपंचायत सदस्य बबन पाटील यांनी समाजाच्या जडण घडणीमध्ये शिक्षकाचे स्थान मोलाचे असून  महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हेच या देशातील सर्वात मोठे शिक्षक असून त्यांनी महिलांसह गोरगरीब वंचित घटकांना शिक्षणाची दारं खुली केली त्यामुळेच आज देश प्रगतीपथावर आहे असे सांगितले . 


यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपल्या मोराळे गावातील शाळेत असतानाच्या आठवणी सांगून गावच्या नेतृत्वाने शाळेच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले तर गावाचा चेहरा मोहरा बदलतो अशा भावना व्यक्त केल्या.या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते श्रीरंग शिंदे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी मानले. कार्यक्रमास संतोष गाडे,हणमंत गाडे, निवास पाटील, किसन पाटील, बबन पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

हेही पहा ---

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖