BANNER

The Janshakti News

उत्पादन खर्चावर आधारीत ऊस दर मिळण्यासाठी एस.एम.पी.मध्ये वाढ होणे गरजेचे.... शरद लाड




       

    कुंडल (ता. पलूस) दि. १९ :  ऊस गाळप करुन साखर तयार करणे कारखान्याच्या हातात आहे. मात्र  साखरेच्या दर ठरवणे आपल्या हातात नसल्याने शासनाने एफ.आर.पी. बरोबरच एस.एम.पी. मध्येही वाढ करणे गरजेचे असून,  ऊत्पादन खर्च व ऊसदर यामध्ये तफावत राहत असते  तरीही कारखाना सर्वच खर्चात काटकसर करुन सभासदांना दरवर्षीप्रमाणे जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करत असून मागिल वर्षी एफ.आर.पी. पेक्षा जादा दोनशे नऊ रु. दर दिला असल्याचे   क्रांतिअग्रणी डाॕ.जी.डी.बापू लाड सह. साखर कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन शरद लाड यांनी सांगितले. यावेळी सभेच्या अध्यक्ष स्थानी क्रांती उद्योगसमुहाचे मार्गदर्शक आमदार अरुण(अण्णा) लाड हे होते. याप्रसंगी व्हा. चेअरमन दिगंबर पाटील, क्रांती दुध संघाचे चेअरमन किरण लाड, दिलीप लाड, राजेंद्र लाड , रणजित लाड, विक्रांत लाड, जेष्ठ स्वातंत्र सैनिक विरुपाक्ष लुपणे,  सर्जेराव पवार, कुंडलिक एडके, आदीसह कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे,  व्ही. वाय पाटील आदी  उपस्थित होते.
        
       शरद लाड पुढे म्हणाले सन २३-२४ या गळीत हंगामामध्ये १४५ दिवसात १०,९२,२९५.४८२ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन सरासरी १२.२४ टक्के उतार्याने ११,८६,९८०.०० लाख  क्विंटल साखरेचे उत्पादन होऊन एफ.आर.पी. प्रमाणे प्रती टन ३७६३.०८ मधून ८७२.०९ रु.प्रमाणे ऊस तोडणी वाहतुक खर्च वजा जाता २८९०.९९ रु. दर होत असला तरी कारखान्याने एफ.आर.पी.पेक्षा २०९.०१ रु. जादा अशी  ३१०० रु. मे.टन प्रमाणे रक्कम ऊस उत्पादकांच्या खातेवर जमा केली आहे.
         

   मागिल हंगामामध्ये ६० के.एल.पी.डी. क्षमतेचा आसवणी प्रकल्प उभा करुन २६२ दिवसात २,०८,२८,०००.०० बल्क लिटर्स उत्पाद घेतले तर  १९.७० मेगा वॕट क्षमतेच्या सहविजप्रकल्पातून २,८३,८९,३५७.५ युनिट विज विद्युत मंडळास विक्री केली आहे.
      
    
कारखान्याची गाळप क्षमता ५००० मे.टनावरुन ७५०० मे.टन केली असल्याने आता प्रतिदिन १०,००० मे.टन याप्रमाणे गाळप होणार असल्याने येत्या हंगामामध्ये १४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असल्याने नोंद होणारा सर्व ऊसाचे १०० टक्के गाळप होईल असे सांगून सभासद व ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा असे आवाहन शरद लाड यांनी केले.
    
    कारखान्याने सभासद , कर्मचारी, तोडणी मजुरांसाठी अपघाती विमा, आरोग्य सुविधा, ऊस उत्पादनवाढीसाठी अत्याधुनिक सामग्री, नविन तंत्रज्ञान, खते, औषधे, बियाणे यासह शेतकरी प्रशिक्षणासह विक्रमी ऊस उत्पादन घेणार्‍या व प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन व गुणगौरव आदी उपक्रम राबविले जातात.तर कर्मचारी व कुटुंबियासह तोडणी कर्मचारी यांना मोफत आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत.
       
  ऊस वाहतुकदारांच्या फसवणूकीबाबत बोलताना ते म्हणाले वाहतुकदारांची तोडणी मुकादमाकडून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा फटका वाहतुकदारांना बसू नये म्हणून आता वाहतुकदारांना कायदेशीर मार्गाने ॲडव्हान्स  वसूलीसाठी आवश्यक ती मदत कारखान्याकडून केली जाणार असल्याचेही शरद लाड यांनी यावेळी सांगितले.
     
  सहकारी कारखाना चालवणे खुप अडचणीचे असते मात्र सभासदांच्या सर्व सुचनांचा आदर करुन कामकाजामध्ये बदल करुन सुधारणा करणे हे सहकार टिकविण्यासाठी महत्वाचे असल्याने स्व. डाॕ.क्रांती अग्रणी डाॕ.जी.डी.बापूंच्या मार्गदर्शक तत्वानुसार व आमदार अरुण अण्णांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सभासदांच्या पाठबळावर आम्ही  संचालक मंडळ काम करत असतो.
     
  कारखाना क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये करीयर करणार्‍या सभासदांच्या व ऊस उत्पादकांच्या पाल्यांना सतत प्रोत्साहन देत असून कारखान्याकडून शेतीच्या विकासाबरोबरच सभासदांच्या चौफेर विकासासाठी कारखाना कटीबद्ध असल्याचे शेवटी शरद लाड यांनी सांगितले .

      आमदार अरुण लाड मार्गदर्शन करताना म्हणाले शासनाचे चुकीचे धोरण ऊस उत्पादक व साखर कारखान्यांच्या मुळावर उठत असून साखरेच्या आयात निर्यातीबाबत धरसोडीचे धोरण व इथेनाॕल बाबत च्या सततच्या बदत्या धोरणाचा फटका कारखान्यांना बसत असून मागिल हंगामामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये १४.९७ लाख मे.टन साखर हंगामापूर्वीच शिल्लक होती या हंगामामध्ये ११०.१७ लाख मे.टन
 
  उत्पादन होऊन १२५.१४ लाख मे.टन एवढे उत्पादन झाले होते, त्यातुन ८८.७९ लाख मे.टन विक्री होऊन आणखी २६.३५  मे.टन साखर हंगाम पुढील हंगाम सुरु होणेपूर्वी शिल्लक राणार आहे. सद्या साखरेचे दर ३५०० प्रति क्विंटल असून शासनाने एस.एम.पी.न वाढविल्याने साखर कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत.
       
  या सर्वावर उपाय योजना म्हणजे एकरी शेतकर्यांनी जास्तीत जास्त उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. कारखान्याने ऊस लागणीपासून तोडणी व गाळपापर्यंत सर्व नोंदी जी.पी.एस व मोबाईल अॕपद्वारे होत असल्याने या सुविधेचा लाभ व वापर सभासादांनी करावा असे आवाहनही यावेळी केले. 
      
  या सभेदरम्यान सभासद अपघात विमा योजनेअंतर्गत दोन सभासदांच्या वारसांना अपघात विमा रकमेचे चेक प्रदान करणेत आले.
      
   स्वागत दिगंबर पाटील यांनी केले तर नोटीस व विषय वाचन आप्पासाहेब कोरे, परबतराव यादव, विरेंद्र देशमुख, आदींनी केले तर सुत्रसंचलन पवन चव्हाण  यांनी केले. 
 
  यावेळी संचालक पोपट संकपाळ, सौ.अश्विनिताई पाटील, वैभव पवार,आदीसह सर्व आजी माजी संचालक, कुंडल चे सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जून कुंभार, ग्रा.सदस्य,  पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सभासद, महिला सभासद मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


कुंडल(पलूस) येथील क्रांतीअग्रणी डाॕ.जी.डी,बापू लाड सह. साखर कारखान्याच्या २८ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये प्रथमच सभासदांना संबोधित करताना चेअरमन शरद लाड, यावेळी क्रांती उद्योगसमुहाचे मार्गदर्शक आ.अरुण(अण्णा) लाड, व्हा. चेअरमन दिगंबर पाटील क्रांती दुध संघाचे चेअरमन किरण लाड, दिलीप लाड, राजेंद्र लाड , रणजित लाड, विक्रांत लाड, जेष्ठ स्वातंत्र सैनिक विरुपाक्ष लुपणे,  सर्जेराव पवार, कुंडलिक एडके, आदीसह कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे,  व्ही. वाय पाटील आदी  उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖