सांगली, दि. 12, (जि.मा. का.) : पीक कर्जासह अन्य शासकीय योजनांतर्गत कर्जाचे प्राप्त प्रस्ताव सर्वच बँकांनी प्राधान्याने व सकारात्मक दृष्टीकोनातून 31 मार्च पूर्वी निकाली काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे उपअंचलिक प्रबंधक विशालकुमार सिंग, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख, विविध विकास महामंडळांचे व्यवस्थापक, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्व बँकांनी आपल्याकडील दैनंदिन सेवा देताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे निर्देशित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, पीक कर्ज यासह विविध महामंडळाकडील लाभार्थींचे कर्ज प्रस्ताव बँकांनी वेळोवेळी विहीत मुदतीत निकाली काढावेत, त्यात कोणतीही दिरंगाई करू नये. प्रस्तावात त्रृटी असतील तर अर्जदारास सहकार्य करून त्रृटींची पूर्तता करून देण्यावर भर द्यावा. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकांनी विहित वेळेत पूर्ण करावे, असे ते म्हणाले.
यावेळी कृषि व तत्सम क्षेत्र, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यासह अन्य प्राथमिक व अप्राथमिक क्षेत्रांकरिता विभागवार बँकनिहाय उद्दिष्टे व पूर्तता, पीक कर्ज वितरण तसेच, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, अटल पेन्शन योजना, आरसेटी, माविम, जीवनोन्नती अभियान विविध महामंडळांकडील कर्ज योजना अशा केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे उद्दिष्ट व कर्ज वितरण आदिं चा बँक निहाय आढावा घेण्यात आला.
अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी सादरीकरण केले. प्राथमिक व अप्राथमिक क्षेत्राकरीता डिसेंबर 2024 अखेर उद्दिष्ट पूर्ततेच्या 105 टक्के उद्दिष्ट साध्य केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कर्ज वितरणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कर्ज वितरणासाठी समन्वय साधणाऱ्या अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांचाही सत्कार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केला.
यावेळी पी.एम.एफ.एम.ई, ए.आय.एफ, बचतगट तसेच रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचे जिल्ह्याचे लक्षांक पूर्ण केल्याबद्दल संबंधित विभागाचे अधिकारी व योगदान देणाऱ्या बँक प्रतिनिधींचा सत्कारही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला.