जिल्हाधिकारी कार्यालयात मौखिक कर्करोग जनजागृती अभियान
सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : कर्करोगाच्या अनुषंगाने तपासणी करून कर्करोग लक्षणे असलेल्या रूग्णांचा शोध घेत त्यांना आवश्यकतेनुसार निदान व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम वेळोवेळी राबविण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, सांगली व वसंतदादा पाटील दंत महाविद्यालय, कवलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मौखिक कर्करोग जनजागृती अभियान व रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद कामत, ओरल पॅथॉलॉजीच्या विभाग प्रमुख डॉ. ममता कामत, डॉ. उमा दातार-चौगुले, डॉ. माधुरी साळे, वसंतदादा दंत महाविद्यालयाच्या ओरल पॅथॉलॉजीच्या विभाग प्रमुख डॉ. प्रिया जोशी, डॉ. किरण जाधव, डॉ. माधुरी चौगुले व डॉ. संगिता पाटील उपस्थित होत्या.
कर्करोग झाल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुध्दा बिघडून जाते. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसांमध्ये शरीरात दिसणाऱ्या कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘इंडिया कॅन’ मोहिमेअंतर्गत मौखिक कर्करोग जनजागृती पथनाट्य जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर सादर केले. जगभरातील एकूण कर्करोगग्रस्तांच्या संख्येपैकी निम्मी संख्या भारतात आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते सेवन. आपला देश तंबाखूचा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक आहे. यामुळे मौखिक कर्करूग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तज्ज्ञांच्या मते तंबाखू, गुटखा, सिगारेट किंवा खैनी सेवन टाळणे काळाची गरज आहे.
या अभियानासाठी खास करून इंडियन असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सिलोफेशियल पॅथॉलॉजिस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.