पावसाळ्यापूर्वी सांगली पेठ रस्त्याचे काम पूर्ण करावे
... जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : सांगली पेठ रस्त्याचे काम कालमर्यादा निश्चित करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले.
सांगली पेठ रस्त्याच्या कामाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अजय पवार, उपजिल्हाधिकारी (समन्वय) वसुंधरा बारवे, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सांगली शहरच्या पोलीस उपअधीक्षक विमला एम. राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंता एस. पी. नाईक, वाळव्याच्या उपअधीक्षक, भूमिअभिलेख सुजाता माळी यांच्यासह रस्त्याचे कंत्राटदार उपस्थित होते.
सांगली ते पेठ नाका हा महामार्ग अनेकांच्या दैनंदिन वाहतुकीचा मार्ग आहे. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण होऊन चांगला, दर्जेदार रस्ता व्हावा, यासाठी नागरिक वारंवार पाठपुरावा करत आहेत. या अनुषंगाने कामाच्या आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली पेठ रस्त्याच्या निवाड्याचे काम पूर्ण झाले आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी जे निवाडे केले होते, त्यांच्या मान्यतेची बैठक काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झाली आहे. त्या सर्व आठही निवाड्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने महिनाअखेरपर्यंत निवाडे झालेल्या खातेदारांना निधीवाटपाच्या अनुषंगाने नोटिसा देण्याची कार्यवाही करावी. कंत्राटदारांनी पावसाळ्याच्या आत रस्ता तयार करावा, जेणेकरून नागरिकांची सोय होईल व रस्त्याचे दोन्ही भाग मे अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी कामाला गती द्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ज्या ठिकाणी तांत्रिक मुद्दे राहिले असतील, ते दूर करावेत. कोणत्याही प्रकारे भूसंपादन अपूर्ण राहिले नसल्याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी. उपविभागीय अधिकारी इस्लामपूर आणि मिरज यांनी खातेदारांनी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत बैठक घ्यावी. खातेदारांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवावी, असे त्यांनी सूचित केले.
यावेळी कार्यकारी अभियंता एस. पी. नाईक यांनी कामाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. भूसंपादन अधिकाऱ्यांनी निवाड्याची कार्यवाही पूर्ण झाली असल्याचे उपस्थितांना अवगत केले. पावसाळ्याच्या आत रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करू, अशी ग्वाही कंत्राटदारांनी यावेळी दिली.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली, दि. १७, (जि. मा. का.) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२५ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सांगली येथे महिला मेळावा, स्थळ – दैवज्ञ भवन, कोल्हापूर रोड, सांगली स्टँड मागे, सांगली शहर. दुपारी १२.३० ते १.३० वाजेपर्यंत राखीव (माधवनगर रोड, शासकीय विश्रामगृह सांगली). दुपारी १.४५ ते २.३० वाजेपर्यंत पत्रकार परिषद (माधवनगर रोड, शासकीय विश्रामगृह सांगली). दुपारी २.३० वाजता श्रीमती तारा भवाळकर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या निवासस्थानी भेट.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते
निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एकूण ११७ प्रकरणे पात्र
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची एकूण ८१ प्रकरणे पात्र
सांगली, दि. १७, (जि. मा. का.) : कुणी दिव्यांग, कुणी घटस्फोटीत, कुणी दुर्धर आजाराने ग्रस्त… प्रत्येकाची व्यथा न्यारी.. रोजचं जगणं परीक्षा घेणारं… अशा वेळी कुणीतरी दुःखावर फुंकर घातली तर भर उन्हात वाऱ्याची झुळुक घेऊन येते. अशा निराधारांचं जीवन सुसह्य करणारा छोटेखानी कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडला. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या पात्र लाभार्थींना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. मंजुरीपत्र मिळाल्यानंतर हक्काचा आधार मिळाल्याची भावना या लाभार्थींच्या चेहऱ्यावर होती.
यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, संजय गांधी निराधार योजना तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सुमेधा अभ्यंकर, संदीप पाटील, मकरंद केंगार, सतीश कुंभार, भारत लोटे, दीपाली शिंदे व स्नेहल मुळीक यांच्यासह विविध लाभार्थी यावेळी उपस्थित होते.
शासनाने निश्चित केलेल्या १०० दिवसांचा कृती आराखड्यामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी प्रभावीपणे कार्यवाही करण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत. १०० दिवस कृती आराखड्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एकूण ११७ व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची एकूण ८१ प्रकरणे पात्र करण्यात आली आहेत. पात्र लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते मंजुरी आदेश वाटप करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना सांगली शहर अध्यक्ष तथा तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी संजय गांधी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ५६ व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची ३९ अशी एकूण ९५ प्रकरणे पात्र करण्यात आली. दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजीच्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ६१ व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची ४२ अशी एकूण १०३ प्रकरणे पात्र करण्यात आली.
माहे मे २०२५ महिन्यामध्ये पुढील बैठक होणार असल्याने सर्व संबंधितांनी अर्ज करावेत, त्याबाबत कोणतीही अडचण आल्यास संजय गांधी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही मध्यस्थी अथवा अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांनी केले आहे.
एसएसबी परीक्षा पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी
उमेदवारांच्या २ मे रोजी मुलाखती
सांगली, दि. १७, (जि. मा. का.) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी (Service Selection Board) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. ५ ते १४ मे २०२५ या कालावधीत एस.एस.बी. कोर्स क्र. ६१ आयोजित करण्यात येत आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे दिनांक २ मे २०२५ रोजी मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. मुलाखतीस येते वेळी उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-61 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत - (१) कंम्बाईड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखती साठी पात्र झालेले असावे. एनसीसी 'C' सर्टिफिकेट ‘A’ किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्स साठी एस.एस.बी. मुलाखती साठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एस एस बी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२३३-२९९०७१२ आणि ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाटसअप क्र. ९४०४९६९१४५ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहनही डॉ. चवदार यांनी केले आहे.
केंद्रीय सैनिक बोर्ड विभागाची वेबसाईट अपग्रेडेशनसाठी बंद
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : केंद्रीय सैनिक बोर्ड विभागाच्या वेबसाईटचे अपग्रेडेशनचे काम चालू असल्याकारणाने ही वेबसाईट 2 ते 3 महिने बंद राहील याची सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी नोंद घ्यावी. ही वेबसाईट पूर्ववत चालू झाल्यानंतर त्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाव्दारे दिली जाईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत मिरज येथे
महिलांसाठी मोफत वस्त्रालंकार, फॅशन डिझाईन प्रशिक्षण सुरू
सांगली, दि. १७, (जि. मा. का.) : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली व बी. ओ. आय. स्टार सांगली आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे महिलांसाठी वस्त्रालंकार, फॅशन डिझाईन चे 31 दिवस मोफत प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी उपस्थित आरसेटी संचालक महेश पाटील व प्रशिक्षिका शीतल देसाई यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
ग्रामीण भागातील युवक-युवतींना एक कुशल उद्योजक बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींचे उत्पन्न वाढावे, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी स्वयंरोजगार करावा या उद्देशाने सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींना बँक ऑफ इंडिया आरसेटीकडून महिलांसाठी वस्त्रालंकार, फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेला सर्व अभ्यासक्रम जसे साडी चे प्रकार झिग -झॅक (मस्तानी), काष्टा, नववार, पेशवाई, शाळेचे मुला मुलींचे युनिफॉर्म, लहान मुलींचे फॅन्सी फ्रॉक व ड्रेस, फॅन्सी ब्लाऊज चे सर्व प्रकार, ड्रेस डिझायनिंग-वनपीस, चुडीदार, पंजाबी, पटियाला, राजस्थानी, आणारकली टॉप, अपल कट टॉप, आमरेला टॉप, सलवार पंजाबी, पटियाला, राजस्थानी, धोती पॅन्ट, बलून पॅन्ट, पिको फॉल, पेटीकोट, साधा व कळीचा परकर, इतर अभ्यासक्रम प्रात्यक्षिकासह शिकवला जात आहे. व्यक्तिमत्त्व विकास, उत्तम संभाषण कौशल्य, उद्योजकिय सक्षमता, बँकेचे व्यवहार, विपणन व्यवस्थापन, विविध शासकीय योजनेबाबत माहिती आणि मार्गदर्शन केले जात आहे.
यावेळी संचालक महेश पाटील यांनी संस्थेअंतर्गत घेण्यात येणारे पुढील प्रस्तावित प्रशिक्षण कार्यक्रम जसे, 12 दिवसीय फास्ट फूड लघु उद्यमी व 20 दिवसीय पापड, लोणचे व मसाला पावडर बनवणे या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन आरसेटी चे प्रशिक्षक प्रदीप साळुंखे व प्रवीण पाटील यांनी केले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰